पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा, वाढती व्यसनाधीनता आणि स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात सर्वसामान्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी सोमवारी (दि. 23) शहरातून चेतना रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी पत्रकार परिषदेत केले.
रॅलीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, क्लब सहभागी होणार आहेत. रॅलीस सकाळी नऊ वाजता मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होईल. महात्मा गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली क्रमांक सहा, जमनालाल बजाज रोड मार्गे रॅली काढण्यात येईल. रॅलीचा जैनस्थानकात समारोप होईल. रॅलीदरम्यान विविध जाती, धर्माचे धर्मगुरू मार्गदर्शन करतील. रॅलीद्वारे प्लास्टिक वापरामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान, त्यापासून निर्माण होणारे धोके आदींसह समाजातील वाढते व्यसनाचे प्रमाण, स्त्री भ्रूणहत्या आदी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. धुळे शहर प्रदूषणमुक्त करणे हा रॅलीचा मुख्य उद्देश आहे. पर्यावरणात पशू-पक्षी, प्राण्यांचे अस्तित्व कायम राहिले तरच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहील. सण, उत्सवात सजावट करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षांची तोड होते. हे सर्व थांबले पाहिजे. त्यासाठी वैचारिक क्रांतीची गरज असून, नागरिकांमध्ये कर्तव्याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. रॅलीतून हीच जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रॅलीत विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. नागरिकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन कमलमुनी कमलेश यांनी केली. या वेळी नगरसेवक राजेंद्र कटारिया, युवराज करनकाळ, विनोद मोराणकर, नितीन बंग आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, चेतना रॅलीची तयारी पूर्ण करण्यात आली असून रॅलीची नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी शहरात प्रचार अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment